मुर्ती कशा ओळखायच्या?
मुर्ती कशा ओळखायच्या?
Maharashtra Times | Updated: 10 Jul 2016, 03:07:00 AM
घरापासून मंदिरांपर्यंत अनेक मूर्ती आपण बघत असतो. या मूर्ती सरावाने आपण ओळखतो. तरीही अनेक मूर्तींची ओळख आपल्याला सहजासहजी पटत नाही. म्हणूनच विविध देवतांची चिह्नं जाणून घेतली, तर मूर्ती ओळखणं एकदम सोपं होऊन जाईल.
साहजिकच मग देव मूर्ती कशा स्वरूपात करायच्या? कोणत्या वस्तू वा धातूंपासून तयार करावयाच्या? त्यांची उपासना कशी करायची? याविषयीचे मूर्तिशास्त्र व धर्मशास्त्रही तयार झाले. त्यानुसारच अगदी थेट सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच देशात मूर्तींची प्रमाणबद्ध व योग्य त्या रूपात घडणावळ तसेच, शास्त्रोक्त पूजा-अर्चा नित्यनेमाने सुरू झाली. एवढेच नव्हे तर, येथील विविध धर्मपंथीयांनी देवांची वाटणीही केली. जसे वैष्णवांचा विष्णू, शैवांचा शिव, शाक्तांच्या शक्ती, गाणपत्यांचा गणेश इ. (आज तर, माणूस केवळ स्वार्थासाठीच कोणालाही, केव्हाही ‘देव’ मानतो, हा भाग वेगळा.)
परंतु, सर्वसामान्यांना सारख्याच वाटणाऱ्या देव-मूर्ती कशा ओळखायच्या? हा प्रश्न वर्षानुवर्षं अद्यापही कायमच असून, त्याच्याच उत्तरासाठी हा लेखप्रपंच होय. सामान्यतः सार्वजनिक देवळातील देव-प्रतिमा अधिक प्रमाणात पाषाणाच्या असतात तर; घरोघरी पूजेत असलेल्या मूर्ती पितळ, तांबे, सोने वा पंचधातूच्याही बनवितात, हे विशेष.
मूर्तींचे चल-अचल, आसन-स्थानक, केवल-संयुक्त, मिश्र, सौम्य-उग्र, तसेच शयन (उदाहरणार्थ विष्णूच्या शेषशायी अनंताच्या रूपातील सुंदर प्रतिमा पैठण, चारगणा, परभणी इ. ठिकाणी उपलब्ध असून, खुल्ताबादेचा (जि. औरंगाबाद) भद्रा मारुती आणि आव्हाने बु. (जि. अहमदनगर) येथील गणपती शांत निद्रावस्थेत आहेत) असे प्रकार आहेत.
सामान्यतः देव प्रतिमा एकमुखीच असतात. तरी पण, द्विमुखी, त्रिमुखी, चतुर्मुखी, पंचमुखी, षण्मुखी (कार्तिकेय), दशमुखी (रावण-वेरूळ, औंढा, मार्कण्डी.), द्वादशमुखी (औंढा) आढळतात. तामिळनाडूतील एक कार्तिकेय तर २६ मुखी व ५२ हाताचा आहे, हे विशेष. पैठणचा नृसिंह १६ भुजी तर, औंढ्याचा महाविष्णू १८ हाताचा आहे, हे उल्लेखनीय वाटते.
मूर्तीतील देव प्रतिमा सामान्यतः द्वि-पादच असतात. पण, त्रिपाद वा चतुर्पादी (मार्कण्डी, जि. गडचिरोली) देव-मूर्तीही आढळतात. तसेच, महापूर (जि. लातूर) येथील अष्टोत्तर (१०८) शिवलिंग आणि कुडलसंगमचे (जि. सोलापूर) ३६४ मुखांचे भव्य शिवलिंग व मानवत (जि. परभणी), खरकाडा (जि. गडचिरोली) येथील द्वादश-शिवलिंगे दुर्मीळच ठरतात.
कोणत्याही मूर्तीची ओळख देवाच्या हातातील आयुधे किंवा त्यांची वाहने यावरूनच होत असते. जसे शिवाचे वाहन नंदी, विष्णूचे गरूड, ब्रह्मदेवाचे हंस इ. पद्म, शंख, चक्र व गदा ही विष्णूची तर, सर्प, त्रिशूल, डमरू, अक्षमाला ही आयुधे शिवाची असतात. म्हणून मूर्तीतील वाहने व आयुधे स्पष्ट दिसायलाच पाहिजेत.
मूर्ती भंगल्यामुळे वाहने कळली नाहीत पण, आयुधे समजलीत किंवा वाहने कळलीत पण, आयुधे समजू शकली नाहीत, तरी मूर्तींची निश्चिती करता येते.
उदा. कुपटा (जि. वाशिम) येथील गरूडारूढ लक्ष्मी-नृसिंहाची आणि ‘गोधासनाद भवेद गौरी’ रूपातील निलंगा (जि. लातूर)ची हरगौरीची, या मूर्ती फारच वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. तर, गाढव वाहन असणारी मुखेड (जि. नांदेड)ची ज्येष्ठादेवी महाराष्ट्रात एकमेवच आहे.
बऱ्याच वेळा मूर्तीलेखांच्या मदतीनेही देव प्रतिमांची ओळख व काळ निश्चित करता येतो. जसे, काटा (जि. वाशिम) येथील (इ.स. १३०३) लक्ष्मीची आणि कंधार (जि. नांदेड)ची धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील गौतम बुद्धाची (इ.स.चे ८वे शतक) मूर्ती होय.
प्रतिमेतील देवांच्या संख्येवरूनही ढोबळमानाने मूर्तींचा परिचय होऊ शकतो. उदा. तळीखेड (जि. लातूर)चा एकादशरूद्राचा पट किंवा अनेक ठिकाणचे नवग्रह, अष्टदिक्पाल व सप्तमातृका होत. श्रीरंगपट्टणम् (कर्नाटक) येथील रंगनाथस्वामींच्या भव्य देवळातील मंडप-स्तंभावरील विष्णूच्या केशवादि २४ मूर्ती मी संख्येवरूनच निश्चित करू शकलो.
वैष्णव प्रतिमांचा अभ्यास काळजीपूर्वक करावा लागतो. कारण, विष्णूच्या केशव, नारायणादी रूपांची ओळख केवळ हातामधील पद्म, चक्र, शंख व गदा या आयुधांच्या क्रमावरूनच होऊ शकते. उदा. वाशिमचा बालाजी ‘जनार्दन’ असून, औंढ्याच्या नागनाथ देवळातील काचेच्या ‘शो-केस’मधील विष्णू ‘केशव’ तर, जवळचा ‘माधव’ आहेत. अन्वा (जि. औरंगाबाद)च्या शिवालयावरील नृत्यरत २४ ही विष्णू-पत्नींची ओळख आयुधांवरूनच करता आली.
देवळाच्या गाभाऱ्यातील प्रतिष्ठापित लिंगे वा मूर्ती पूजेसाठीच असतात तर, मंदिरे, लेणी वा अन्य ठिकाणच्या नाना धाटणीच्या मूर्ती वा शिल्पाकृती पूर्वजांच्या जीवनशैली, आचार-विचार तसेच तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकरिता कोरतात. त्याद्वारे आपल्याला सद्य जीवनात यशस्वी वाटचालीसाठी सुरेख मार्गदर्शन मिळू शकते. म्हणूनच, प्राचीन कलाकृती केवळ पर्यटन किंवा भक्तिभावासाठीच पाहावयाच्या नसतात, हे प्रत्येकाने समजून घेऊनच, आपल्या महान संस्कृतीचा हा अनमोल ठेवा त्यांच्याशी कलेच्याच दृष्टीने मैत्री करून जतन केला पाहिजे.
Comments
Post a Comment